Pages

Sunday, July 10, 2011

आज, अभिमान बाळगावा? का? कशाचा?

मागे एकदा Dr. A. P. J. Abdul Kalam यांनी त्यांच्या एका लेखात लिहिलं होत् की ‘भारतीय लोकांना आपल्या देशाप्रति जेवढा आपलेपणा, प्रेम आणि अभिमान असायला हवा तेवढा नाहीये’. इतकच नाही तर त्यांनी या करता काही उदाहरण देखील दिली होती ज्यात त्यांनी प्रेम, आपलेपणा आणि अभिमान जागरूक करण्याकरता काही मुद्दे मांडले होते. त्यातील एक मुद्दा असा होता की, सर्वात पहिले वर्तमानपत्रात पहिल्या पानावर कोणत्याही वाईट किंवा negative बातम्या छापणे थांबवावे.  Dr. Kalam असं म्हणतात की गेले अनेक वर्ष पाहिल्या पानावर चोऱ्या, खून, बलात्कार, अपघात, दारू पिऊन दंगा, लाच घेणे अश्याच बातम्या छापल्या जातात. या उलट मुद्दामून, ठरवून चांगल्या आणि positive बातम्या छापल्या तर लोकांमध्ये देशाबद्दल एक चांगुलपणा येईल. त्यांनी मांडलेला हा मुद्दा अगदी वाखाणण्याजोगा आहे. आपल्याकडे बरेच लोक असे आहेत, ज्यांना मनापासून आपल्या देशा बद्दल प्रेम आणि अभिमान हा असतोच, पण कालांतराने त्यांना या गोष्टींचा विसर पडतो. त्यामुळे ती भावना जागरूक करायला, त्यांना सतत या ना त्या परीने जाणीव करून देणे हे गरजेचे आहे. अर्थात अशी भावना जागरूक करून द्यायला लागूच नये. पण काहीतरी चांगला होण्याकरता काही गोष्टी मुद्दामूनच सांगाव्या लागतात त्यातलाच हा एक भाग. सतत काहीतरी चांगलं वाचण्यात आणि ऐकण्यात येत आहे आणि ते ही आपल्या देशाबद्दल आहे, ह्यामुळे निदान काही टक्के लोकांचा दृष्टिकोन तरी बदलेल, अशी अपेक्षा करणं काही चुकीचं नाहीये.

पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर आज बोटावर मोजण्या इतक्या बातम्या असतील ज्या वाचून आपल्याला  आपल्या देशाबद्दल अभिमान वाटेल. त्यामुळे पहिल्या पानावर ठरवून सुद्धा सगळ्या positive बातम्या छापायच्या म्हटलं तरी छापता येणार नाहीत. नको त्या बातम्यांचं प्रमाण इतकं आहे की सगळ्या लोकांना ते पूर्णपणे कळणे हे देखील गरजेचे झाले आहे. लोकांना जर 2G घोटाळ्याबद्दल कळालचं नसतं तर कदाचित तो गैरव्यवहार अजूनही वाढला असता. तिकडे आदर्श घोटाळा बाहेर आला नसता तर तो लोकांना कळणार कसा? जेसिका लाल हत्याकांड, नितीश कटारा हत्याकांड, अगदी अलीकडील जन-लोकमत बिल आज जर लोकांपर्यंत पोचलं नसतं तर ह्या सगळ्यांना न्याय मिळाला असता का?

त्यामुळे आजच्या परिस्थितीसाठी Dr. Kalam यांनी मांडलेला हा मुद्दा थोडा बदलावा लागेल. वर्तमान पत्रात पहिल्या पानावर जरी काही वाईट किंवा negative बातम्या छापून येत असतील तरी त्यात काही गैर नाही. पण सगळ्या लोकांना, आपल्या देशात जे-जे काही वाईट आणि विचित्र कारभार चालू आहेत ते मात्र कळायलाच हवे. कदाचित त्यामुळेच लोकं जास्तं जागरूक होतील.

तुम्ही म्हणाल की त्या देशाबद्दलच्या अभिमानाचं काय? मी म्हणेन की अभिमान हा असा उगाचच येत नसतो किंवा मुद्दामून तयार नसतो करता येत. एखाद्या गोष्टीबद्दल अभिमान वाटण्याकरता काहीतरी करावं किंवा घडवावं लागतं. अगदी छोटं उदाहरण आहे. आपण बघत असतो, वाचत असतो की तिकडे बाकीच्या पाश्चात्य देशात प्रगती इतकी मोठ्या प्रमाणात होत् आहे. 2G सोडा तिकडे आता 4G लोकांच्या दाराशी आलं आहे. आपल्याकडेही अशी नव-नवीन तंत्रज्ञान नक्की आमलात आणता येतील आणि आमलात येत देखील आहेत. आणि तसं जर होत असेल तर आपले लोकं Dr. Kalam म्हणतात त्या प्रमाणे पाश्चात्य देशांकडे नबघता आपल्याच देशाकडे अभिमानाने पाहतील. पण मग मला सांगा ज्या गोष्टीमुळे अभिमान वाढावा त्याचं गोष्टींमध्ये जर घोटाळे व्हायला लागले तर लोकांनी देशाबद्दल अभिमान वाटून घ्यावा का?

इजिप्त, बहारीन आणि लिबिया मध्ये चालू असलेल्या हुकुमशाहीला आपलं सरकार जाहीर पणे विरोध करत आहे. पण आपल्या देशात सुद्धा काही वेगळं चित्र आहे अशातला भाग नाहीये. आपण सगळे अगदी मान वर करून आपल्या सैन्याचा अभिमान बाळगतो. तिकडे सरकार सैन्यात भरती होण्याकरता खूप प्रमाणत प्रोत्साहन पण करत आहे. पण त्याच सैनिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये घोटाळे होत् आहेत. एवढाच नव्हे तर त्यांच्या करता तयार केल्या गेलेल्या शवपेटिका, यात सुद्धा गैर-व्यवहार झाले आहेत आणि गैर-व्यवहार करतात कोण तर हेच जे देश चालवत आहे. आपल्याकडे लोकशाहीच्या नावाखाली हुकुशाहीच चालू आहे असं म्हटलं तरी आज खोटं नाही ठरणार. जे राज्य करत आहेत तेच नियम बनवत आहेत, आणि जे घोटाळे करत आहेत तेच राज्य करत आहेत आणि त्यांची सावरा-सावरा करायला अजून वेगळे नियम-कायदे केले जात आहेत. ही अशी दुटप्पी भूमीका जर आपणच निवडून दिलेले ते राज्यकरते घेत असतील तर अभिमान येईलच कसा? स्वाभाविक पणे आपल्याच देशाबद्दल लोकांच्या मनात लाज आणि द्वेष निर्माण होण्याशिवाय राहणार नाही आणि त्यात काही गैरही नाही.

ह्यावर बरेच लोकं नेहमी म्हणतात “सामान्य माणसाने पाउल उचलायला हवं, त्याने अमुक करायला हवं, त्याने तमुक करायला हवं”. काहीही झालं की नेहमी सामान्य माणूस. अरे सामान्य माणूस का पाउल उचलेल? मी म्हणेन की सामान्य माणूस हा असाच असतो, तो सगळं चित्र उघड्या डोळ्याने बघत असतो, त्याची टीका करत असतो किंवा त्यांना बोटं दाखवत असतो कारण तो सामान्य माणूस आहे. त्याला त्या पुढे काही करता येत नसतं आणि आपल्या देशात हेच सत्य आहे. सामान्य माणसाला जगा समोर काहीतरी करून दाखवायला थोडं तरी पाठबळ लागतं जे खूप कमी लोकांना लाभतं. त्यामुळे सामान्य माणसाने काहीतरी करून दाखवावे ही अपेक्षाच चुकीची आहे.

पण हे ही इतकंच खरं आहे की एवढं सगळं असूनही मला आणि माझ्या सारख्या अनेकांना भारता बद्दल अभिमान आहे आणि तो नेहमीच असणार. ज्या लोकांना अभिमान नाहीय त्यांनी तो जागरूक करायला निदान एकदा एक प्रयत्न तरी करायला हवा. आपल्या देशा बद्दलचा अभिमान जागरूक करायला काही मोजकी लोकं आज आपल्याच समोर आहेत, त्यांच्याकडे बघा. Dr. Kalam, Dr. Prakash Amte अगदी साधी सोपं उदाहरण घ्यायचा झालं तर आपल्या देशाचं सैन्य, ज्यांना सगळी सत्य परिस्थिती माहित असून सुद्धा ते आपल्या देशाकरता रात्रंदिवस झटत आहेत. कसं आहे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपण जर चांगल्या बाजूला राहून, समोरच्या बाजूकडे एक बारीकसे लक्ष्य ठेवून, काय चांगलं आणि काय वाईट यातला फरक समजून घेतला तर कुठल्याही गोष्टींचे मोज-माप करायला सोपं जातं.

Practically बोलायचं झालं तर आज आपल्या मध्ये कोणी Bhagat Singh, Sukhdev किंवा Rajguru नाहीये आणि कोणी तसे तयार होतील असंही म्हणता येणार नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो तर जे-जे काही वाईट आहे त्याला वाईट म्हणणे. जे-जे चुकीचं आहे त्याला ठामपणे चूक म्हणणे. आप-आपल्या परीने जे चुकीचे आहे त्याचा विरोध करणे. तो विरोध ह्या अशा माध्यमातून व्यक्त करणे. चांगल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देखाबद्दल चा अभिमान टिकवून ठेवणे आणि एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून चांगल्याची अपेक्षा करणे.