Pages

Saturday, November 19, 2011

खरंच, कधी कधी नकळतच.....

मध्यंतरी एका मैत्रिणीचा फोन आला. ऑफिस सुटल्यावर भेटूया म्हणाली. खरतर काही आठवड्यांपासून  मी काही कारणांमुळे बेचैन होतो, अस्वस्थ होतो. मला थोडा एकांत हवा होता आणि त्यामुळे मला कोणालाही भेटण्याची इच्छा नव्हती. पण मला तिला असे तोंडावर नाही म्हणता नाही आले. मी हो म्हणालो आणि तिच्या घरी जायला निघालो. गाडी चालवत असताना देखील मी सारखा त्याच विचारात होतो. आजू-बाजूला काही तरी बघण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे मी त्या विचारातून बाहेर येईन, पण काही केल्या डोळ्या समोर तेच चित्र आणि मनात तेच विचार. नको नको ते विचार डोक्यात येऊन गेले. माझ्या बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे, का जे मला दिसत आहे ते तसेच आहे, ह्या मधला फरक देखील मला कळत नव्हतं. सगळे जग खूप स्वार्थी झाल्या सारखे वाटत होते. पण एवढं सगळं कळूनही ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नव्हते. 

आज मागे वळून बघितल्यावर असे वाटते की ज्या दिवशी पासून मला थोडे-फार कळायला लागले त्या दिवशी पासून मी सतत या नियतीशी भांडत आलो आहे. अभ्यास, चांगले कॉलेज, परत अभ्यास, अमुक हवं-तमुक हवं, परत अभ्यास, 1st क्लास, चांगली नोकरी, पगार, प्रेम, मित्र, सतत या-ना-त्या गोष्टींकरता या नियतीशी झगडतोय. कधी कधी जे हावे ते मिळवायला खूप कष्ट केले, कधी अगदीच काही नाही केले....पण कशासाठी?.....का?....सालं फिरून फिरून एकच उत्तर मिळाले....सुखा साठी. भांडलो, झगडलो, कष्ट केले, पळवाट शोधली का तर जे करत आहे त्यातून सुख मिळावे आणि परत असे झगडायला लागू नये. सगळे सुखासाठी. कधी ते सुख अनुभवले, कधी नाही. हे सगळं करताना एक गोष्ट मात्र मी नेटाने पाळली की आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्याला त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली. बाकीच्यांचे सुख कधीच हिरावून नाही घेतले किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला कधी कमी लेखले नाही, न कधी त्याला दुखावले. पण मग तरी माझ्या बाबतीतच असे का?
या ‘का’ चे उत्तरच मी इतके दिवस शोधत होतो आणि त्याच्यातच गुंतलो जात होतो. शेवटी त्या विचारातच गुंतून गेलेलो मी तिच्या घरी पोचलो होतो. थोडा normal व्हायचा प्रयत्न केला आणि तिच्या घराची बेल वाजवली. घरात एक मंद प्रकाश होता आणि जगजीत सिंग यांची गझल ऐकू आली. आत गेल्या गेल्या मी तिला विचारले “काय ग, हे काय...रूम मध्ये मंद प्रकाश, background ला जगजीत सिंग...काय बेत काय आहे?” ती जरा थांबून आणि अडखळत म्हणाली “अरे सहज...मुड आला म्हणून...चहा घेशील ना?” मी होकार दिला खरा पण मला काहीतरी वेगळे वाटले. 

ती चहा घेऊन आली. खूप दिवसांनी ती भेटली होती त्यामुळे बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मला ही थोडे बरे वाटत होते. बोलता-बोलता माझ्या एकदम लक्षात आले की तिने बऱ्याच दिवसात काही नवीन लिहले नव्हते. अधून मधून ती लिहीत असते आणि मी वाचत असतो. मी तिला विचारले की हल्ली ती लिहीत का नाहीये. एक क्षण थांबून ती म्हणाली की तिला वेळ मिळत नाहीये. मला ते कारण पटले नाही. तिलाही कदाचित मला तिने दिलेले कारण पटले नाहीये हे कळले. ती म्हणाली की अलीकडे तिच्या आजू-बाजूला खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत, घडल्या आहेत, positive negative दोन्ही, त्यांच्यात ती अडकून गेली आहे. त्यांच्या मुळे ती खूप भाऊक झाली आहे आणि सतत त्याच विचारात असते. त्या विचारातून बाहेर पडता येत नसल्यामुळे तिला काही नवीन लिहायला वेळ मिळत नव्हता.   
तिच्या चेहऱ्याकडे बघून मला कळले की ती खरंच खूप भाऊक झाली होती आणि सतत या ना त्या विचारात असणार. हे मला पटले देखील कारण ती अशी कधीच नव्हती आणि आज अचानक ती म्हटल्या प्रमाणे तिच्यातला झालेला बदल मलाही दिसायला लागला होता. मला कळेना की मी पुढे काही विचारू का नको. जे काही घडले होते त्या बद्दल मला जाणून घ्यायचा तसा काही हक्क नव्हता, पण मग एवढे काय झाले आहे ज्यामुळे तिची मनस्थिती अशी झाली आहे. मी तिच्याकडे पहिले. ती अजूनही समोर कुठेतरी शून्यात बघून विचार करत होती. ती म्हणाली “तुला सांगते माणूस जेव्हा अशा परिस्थितीतून जातो, तो कितीही practical असला ना तरी अशा वेळेस तो खूप philosophical होऊन जातो. सतत विचारात असतो. तो जे काही बघत आहे, वाचत आहे अगदी प्रत्येक गोष्ट तो त्याच्या आयुष्याशी relate करतो.” मला फारसे काही कळत नव्हते पण मला तिला विचारायचे ही नव्हते. माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून  तिने मला जगजीत सिंग यांच्या एका गझलच्या दोन ओळी सांगितल्या.

येही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यूं है....
येही होता है तो आखिर...ये होता क्यूं है?

ती म्हणाली “या दोन ओळीतच हल्ली मी जगत आहे”. मी तिच्याकडे पहिले. तिचे डोळे ओले झाले होते आणि बरंच काही सांगत होते. मी थोडा अंदाज बांधायचा प्रयत्न केला, पण अजून खोलात जाऊन तिला विचारण्याचे धाडस माझ्यात झाले नाही.
मी विषय बदलण्याची प्रयत्न केला, म्हणालो “सोडून दे”. असं मी म्हटल्यावर ती म्हणाली “सगळे हेच म्हणत आहेत, सोडून दे..अरे पण जे घडले त्यात माझी काहीच चूक नव्हती, मग मी का सोडून द्यायचे?” तिच्या बोलण्यात एक सच्चेपणा मला दिसत होता. ती ओघाच्या भरात असं काही बोलून गेली जे मलाही पूर्ण पणे पटले. ती म्हणाली “जगात काही क्षुल्लक लोक सोडले ना तर हल्ली मला सगळेच लोक दगड वाटू लागले आहेत. त्यांना भावना, माणुसकी हे शब्द कदाचित माहित देखील नाहीयेत, त्यामुळे त्यांचा अर्थ कळणे ही दुरची गोष्ट. कदाचित त्यांना दगड म्हणणे ही योग्य नाही कारण दगडाला मारून, फोडून एक वेगळा आकार आपण देऊ शकतो. हे लोक असे आहेत की त्यांना आकार द्यायला गेले तर आपले हाथ झिजतील पण त्यांना काही फरक पडणार नाही. त्यांच्या करता माणूस देखील एक खेळणं आहे. थोडे दिवस एका खेळण्याशी खेळा, काही दिवसानंतर बाजारातून नवीन खेळणं आणा आणि मग त्याच्याशी खेळा आणि तो खेळ तसाच वेग-वेगळ्या खेळण्यांशी चालू ठेवा. तुला सांगते आपण एखादे जुने खेळणं देखील ५-१० दिवसांनी परत कपाटातून काढून थोड्या वेळ त्याच्याशी खेळतो कारण आपले त्याच्याशी थोडा वेळ का होईना एक नातं असते. ह्या लोकांना जर भावना आणि माणुसकीच कळत नसेल तर नातं काय असते हे कसे कळणार!”

हे सगळे ती सांगत असताना मी पूर्ण शांत होतो. मी माझ्याच विचारात परत ओढला जात होतो कारण ती अगदी माझ्याच मनातली वाक्य बोलत होती. मला तिची कळवळ, तिचे दुख्ख कळत असून देखील मी काय बोलावे मला सुचेना. मला तिचे सांत्वन ही करायचे नव्हते. तिलाही कळत होते की मी एकदम शांत, थोडासा अडकल्या सारखा झालो होतो. ती माझ्याकडे बघत म्हणाली “तू बोलू शकतोस, मला समजत आहे की तू थोडा awkward होत् आहेस, पण ठीक आहे तुला जे काही बोलायचे आहे ते तू बोलू शकतोस”. मी तिच्याकडे पहिले आणि म्हणालो “सोडून दे, अर्थात मला माहिती आहे की असे म्हणणे खूप सोपे आहे पण जसे जमेल तसे सोडून द्यायचा प्रयत्न कर......आणि हो सोडून द्यायचे म्हणजे जे काय घडले आहे ते विसरायचे किंवा त्या व्यक्तीला विसरायचे, माफ करायचे किंवा त्यांच्या पासून पळ काढायचा असे नाही. सोडून द्यायचे म्हणजे तो जो वर बसला आहे, जो सगळे उघड्या डोळ्याने पाहत आहे, त्याच्या कडे सोडून द्यायचे. काही निर्णय खरंच त्याच्यावर टाकून द्यायचे, अगदी हक्काने. आपण अशातून मुक्त होयचा प्रयत्न करायचा आणि त्याला ही जबाबदारी सोपवायची. पुढे तो जे करेल ते करेल. एक लक्षात ठेव आपले मन साफ असेल तर आपण जे करतो ते नेहमी योग्य असते. त्यामुळे खरंच सोडून दे.” 
ती माझ्याकडे बघून हसली. ती म्हणाली “खूप जण मला हेच म्हणाले की, सोडून दे हा विचार....जाउदे... पण तुझी सोडून दे मागची philosophy का कोणास ठाऊक खूप खरी वाटत आहे. अर्थात मी असे जरी म्हणत असले तरी मी तुझे बोलणे पटून घेईन असे नाही पण तू जे सांगितले आहेस त्यावर मी विचार करेन असे वाटत आहे.  तुला फारसे काही माहित नसूनही तू मला जास्त काही विचारले नाहीस आणि तरीही तू सगळ्यांसारखे सल्ले नाही दिलेस. सांत्वन नाही केले. बघू, तू सांगितले आहेस तसाही विचार करून बघते. हल्ली सगळे option मी try out करत आहे.”

मी परत घरी जात असताना मी जे काही तिला बोललो ते परत आठवायचा प्रयत्न केला. मी माझ्या नकळत असे काही बोलून गेलो होतो ज्याची मलाही गरज होती. एवढे असून सुद्धा मी अशा दृष्टीकोनातून विचार केला नव्हता. न कधी मी इतका philosophical बोललो होतो न कधी मी तसे काही ऐकले होते. पण तिला धीर देताना मी मलाच धीर देईन गेलो होतो याची जाणीव मला होत् होती. 

कधी कधी खरंच आपण अशा situation मध्ये अडकतो ज्यावेळेस काय बरोबर आणि काय चुकीचे हे आपल्याला कळत नाही. सगळचं खुप धुसर आणि अपूर्ण दिसत असते. अशा वेळेस बरेच जण खूप सल्ले देत असतात आणि सगळ्यांचे म्हणणे आपल्याला योग्य वाटत असते. काही केल्या मनातली तग-मग मात्र थांबत नसते, सगळ्यांना सांगताही येत नसते. सतत “का?” ह्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधात असतो. सहाजिकच आहे ते, पण अशाच वेळेस ते एखाद्याचे दोन शब्द, एखादी मिठी, पाठीवर थाप पुरेशी असते त्या situation मधून बाहेर पडायला. कधी कधी समोरच्या माणसाकरता स्वतः थोडे philosophical होऊन बघा, अर्थात नुसते व्हायचे म्हणून किंवा एक कर्तव्य म्हणून नाही पण अगदी मनापासून, त्याच्या भल्याकरता. यामुळे जर त्या व्यक्तीला थोडा जरी आधार वाटणार असेल तर तुम्हालाच एक वेगळे समाधान वाटेल आणि कदाचित हे समाधान तुमच्या नकळत तुम्हांला एक वेगळा दृष्टीकोण देऊन जाईल. 

त्या दिवशी ती अस्वस्थ असण्याचे कारण मी तिला विचारले नाही न तिने मला स्पष्ट पणे सांगितले. माझीही साधारण तशीच अवस्था होती पण मी ही काही बोललो नाही. एवढे असून सुद्धा, नंतर तिच्या चेहऱ्यावरचे ते अगदी किंचितसे समाधान देखील मला समाधान कारक वाटले. त्याच समाधानामुळे माझ्यात एक बळ आले आणि मी जे तिला म्हणालो होतो त्याच्या विचारात मी जगायला लागलो. मी त्या असंख्य विचारांच्या जाळ्यातून बाहेर कसा पडलो हे मला कळले देखील नाही.

त्यानंतर एका आठवड्याने तिचा मला offline ping आला “नवीन लेख लिहला आहे...वाच आणि कळव”. तिचा लेख वाचला. लेख वाचताना माझ्या डोळ्यातले पाणी काही केल्या थांबतच नव्हते. अर्थात हे डोळ्यातले पाणी मी पोटभरून, पोट दुखून हसत होतो, म्हणून होते.
 

4 comments:

Unknown said...

Chhan lihila ahes. Aawadla ani manapasun patala hi.

Ashay..... said...

nice post..swatashi samwad wadhawne ha ekmatra upay ahe..

suraj said...

bhari

dageondaggett said...

Casinos with casino slots - JTM Hub
Casinos with casino slots. In 사천 출장샵 this video, you'll learn the key to 하남 출장마사지 the concept of a slot 경주 출장샵 game, as well as the basic 밀양 출장마사지 concept 오산 출장안마 of where to deposit and